सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात दुःखाची छाया पसरली आहे. विठलापूर पंचायत समिती गणातून नुकतेच निवडून आलेले तृतीयपंथी सदस्य दिलीप अण्णा हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. निवडणुकीतील दणदणीत विजयाचा आनंद साजरा होत असतानाच काही दिवसांतच त्यांचे अचानक जाणे परिसरासाठी धक्कादायक ठरले आहे.
अलीकडील पंचायत समिती निवडणुकीत त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या चिन्हावर उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विठलापूर गणातून त्यांनी तब्बल 2311 मतांच्या फरकाने विजय मिळवत इतिहास घडवला. तृतीयपंथी समाजातील प्रतिनिधी म्हणून हा विजय केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिक स्वीकाराचाही महत्त्वाचा टप्पा मानला जात होता. निकालानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, समाजाने भरभरून पाठिंबा दिल्याबद्दलचा आनंद अनेकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत.
बी.ए. पदवीधर असलेल्या हेगडे यांनी शिक्षणाच्या जोरावर समाजकारण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पंचायत समिती सदस्य म्हणून शिक्षण, आरोग्य, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा त्यांचा मानस होता. ते आवळाई गावचे उपसरपंच म्हणूनही कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे आटपाडी तालुका आणि दिघंची परिसरात शोककळा पसरली असून तृतीयपंथी समाजाच्या नेतृत्वाला मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.




