निधी वाटपातील भेदभाव आणि एलपीजी तुटवड्यावरून राऊतांनी भाजपला सुनावले खडे बोल
संजय राऊत यांनी राज्यातील विद्यमान सरकारवर ‘अनैतिक’ निधी वाटपाचा आरोप करत जोरदार टीका केली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील मागासलेपण दूर करण्यासाठी तेथील आमदारांच्या पक्षाचा विचार न करता समान विकासनिधी मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. विधानसभा आणि लोकसभा अध्यक्षांनी राजकीय चष्मा बाजूला ठेवून निष्पक्षपणे काम करावे, असा सल्ला देताना त्यांनी कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षांचे उदाहरण दिले.
दुसरीकडे, सध्या सुरू असलेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्यावरून राऊतांनी सरकारची चांगलीच कोंडी केली. मुंबईतील ४० टक्के रेस्टॉरंट्स आणि शाळांमधील कॅन्टीन गॅसअभावी बंद पडत असल्याचे सांगत त्यांनी सरकारचा खोटेपणा उघड केला. पंतप्रधान मोदींच्या काशी मतदारसंघातील ‘अन्नपूर्णा मंदिरा’तील अखंड अन्नछत्र गॅस नसल्यामुळे बंद पडल्याचा दावा करत, त्यांनी सरकारला टोला लगावला की, “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवता ना, मग किमान देवळांना तरी एलपीजी पुरवा.” शिर्डीसारख्या ठिकाणी प्रसादाच्या लाडूंमध्ये कपात करावी लागत असल्याबद्दलही त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.




