‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’चे कठीण आव्हान पार करत मुंद्रा बंदरात पोहोचले ३२ लाख सिलेंडरचा साठा
जागतिक स्तरावर इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुज’ हा सागरी मार्ग बंद झाला असून, कच्च्या तेलासह एलपीजीचा (LPG) पुरवठा विस्कळीत झाला आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीत भारताने आपल्या उत्कृष्ट कूटनैतिक कौशल्याचा वापर करून एक मोठे यश मिळवले आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ‘शिवालिक’ हे अवाढव्य जहाज कतरहून ४६,००० मेट्रिक टन लिक्विड गॅस घेऊन गुजरातच्या मुंद्रा बंदरात सुखरूप पोहोचले आहे. इराणची परवानगी आणि कडक पाळत असलेल्या या धोकादायक मार्गावरून जहाज बाहेर काढणे हे भारतासाठी मोठे यश मानले जात आहे.
या एकाच जहाजातून आलेल्या साठ्यामुळे देशातील गॅस टंचाईला मोठा आधार मिळणार आहे. तांत्रिक हिशोबात सांगायचे तर, ४६,००० मेट्रिक टन म्हणजे तब्बल ४ कोटी ६० लाख किलो गॅस. भारताच्या १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरचा विचार करता, या एका जहाजातील साठ्यातून सुमारे ३२ लाख ३९ हजार सिलेंडर भरले जाऊ शकतात. गेल्या दशकात भारतातील गॅस ग्राहकांची संख्या १६ कोटींवरून ३३ कोटींवर पोहोचली असून, मागणीत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारने बंदर अधिकाऱ्यांना घरगुती गॅस उतरवण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील चूल पेटती राहील.




