ही घटना पश्चिम भाईंदरमधील राय गाव परिसरात घडली. मुसळधार पावसात स्कूटरवरून प्रवास करत असताना अचानक नारळाचे झाड स्कूटरस्वारावर कोसळले. या भीषण अपघातात राहुल पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे ठाणे आणि मुंबईतही झाडे कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. ठाण्यात आज पुन्हा झाड कोसळल्याची घटना घडली असून, कळवा येथील मनीषा नगर परिसरातही झाड पडल्याची माहिती समोर आली आहे. तसेच बोरिवली परिसरात रेल्वे रुळांवर झाडाची फांदी कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
या घटनांमुळे पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या झाडांच्या छाटणीच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आवश्यक देखभाल आणि धोकादायक झाडांची छाटणी वेळेत झाली असती, तर अशा दुर्घटना टाळता आल्या असत्या, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
सतत घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या निष्काळजीपणाला जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.




