गेल्या काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कधी थंडी, कधी अवकाळी पाऊस आणि आता वाढता उकाडा — अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून शेतकरी भरपाईची मागणी करत आहेत. दरम्यान,भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील तापमानात वाढ होण्याचा इशारा दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीला पावसाची नोंद झाली, मात्र त्यानंतर उष्णतेत वाढ झाली आहे. कोकणात दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यंदा डिसेंबरमध्येच थंडीची जाणीव झाली होती. १ जानेवारी २०२६ रोजी पावसानंतर थंडी जवळपास नाहीशी झाली. उत्तरेकडील भागातही गारवा कमी झाल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील तापमानाच्या नोंदी पाहिल्यास, निफाड येथे नीचांकी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर अमरावती येथे उच्चांकी ३६.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने अलर्ट जारी केला असून बहुतांश भागांत तापमानात लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवस कोरडे आणि निरभ्र हवामान राहण्याची शक्यता असून नागरिकांना उन्हाचा अधिक त्रास जाणवू शकतो.
यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असण्याची शक्यता वर्तवली जात असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




