मार्चअखेरीस हवामानात मोठा बदल; विजांच्या कडकडाटासह गारपीटीची शक्यता असल्याने बळीराजा पुन्हा संकटात
मार्च महिना संपत असताना महाराष्ट्रात हवामानाची दोन टोकाची रूपे पाहायला मिळत आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे नागरिक घामाघूम झाले असतानाच, आता हवामान विभागाने (IMD) राज्यासाठी पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस राज्याच्या विविध भागात मेघगर्जना आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेषतः दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या अवकाळी संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली सारख्या भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याने पिकांचे मोठे नुकसान होण्याचे भय आहे. एकीकडे उष्ण आणि दमट हवामानाचा त्रास सुरू असतानाच, निसर्गाच्या या लहरीपणामुळे राज्याच्या कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.




