वयाच्या १५ व्या वर्षी आयपीएल गाजवणारा हा ‘लंबी रेस का घोडा’ सचिन तेंडुलकरचा वारसा पुढे नेणार का? निवड समितीसमोर आता मोठा पेच
भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर वैभव सूर्यवंशी नावाचा एक नवा तारा वेगाने चमकू लागला आहे. स्थानिक क्रिकेटपासून १९ वर्षांखालील विश्वचषकापर्यंत आपल्या बॅटने आग ओकणाऱ्या या खेळाडूने आयपीएल २०२६ मध्ये तर कमालच केली आहे. विशेषतः मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ठोकलेला षटकार त्याच्या निर्भय वृत्तीची साक्ष देतोय. आयसीसीच्या नियमानुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी आवश्यक असलेले १५ वर्षांचे वय त्याने गाठले असून, आता त्याला थेट टीम इंडियात संधी द्यावी, अशी जोरदार मागणी क्रिकेटप्रेमींकडून होत आहे. वैभवने टी२० क्रिकेटमध्ये २१ सामन्यांत ३ शतकांसह ८२३ धावा कुटल्या असून त्याच्यातील ‘स्फोटक’ सलामीवीर भारताला भविष्यातील सुपरस्टार मिळवून देण्याची चिन्हे दाखवत आहे.
मात्र, वैभवचा भारतीय संघात प्रवेश होणे इतके सोपे नाही. सध्या टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरमध्ये अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांसारखे खेळाडू आधीच आपली जागा पक्की करून आहेत, तर तिलक वर्मासारखा प्रतिभावान खेळाडू वेटिंग लिस्टमध्ये आहे. वैभव हा नैसर्गिक सलामीवीर असल्याने त्याला मधल्या फळीत खेळवणे त्याच्या क्षमतेवर अन्याय ठरू शकते. त्यामुळे त्याला राष्ट्रीय संघात जागा मिळवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असली, तरी ज्या पद्धतीने तो गोलंदाजांची दमछाक करत आहे, ते पाहता त्याचे पुनरागमन नक्की मानले जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही अशाच लहान वयात पाकिस्तानविरुद्ध आपली ताकद दाखवली होती, आता वैभव सूर्यवंशी त्याच वाटेवर चालून विश्वविक्रमांना गवसणी घालण्यासाठी सज्ज झाला आहे.




