सलग 16 वेळा अपयश, शेवटी जिद्दीने क्रॅक केली MPSC
एकीकडे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती अन् दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांसाठी वेळोवेळी घेतल्या गेलेल्या मुख्य परीक्षांमध्ये तब्बल 16 वेळा आलेले आलेले अपयश. मात्र, हार न मानता परिश्रम,जिद्द व चिकाटीच्या जोरावर ‘एमपीएससी’च्या राज्यसेवा परीक्षेत गवसणी घालणाऱ्या उषा पवारचा (Usha Pawar) प्रवास हा फारच प्रेरणादायी आहे. उषाच्या वडिलांचे सोळा वर्षांपूर्वी निधन झाले होते. ते 9 वर्षे अर्धांगवायुच्या आजारामुळे अंथरुणाला खिळले होते. त्यांचे चार बहिणी आणि एक मोठा भाऊ असे कुटुंब होते. वडील गेल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी आईवर पडली. खूप कमी वयात त्यांनी खूप काही सोसलं.उषाच्या तिन्ही बहिणींची लग्न झाले. त्यांच्या भावाने बूट पॉलिश करुन घराला आर्थिक हातभार लावला. गरीब कुटुंबातून आलेल्या उषाने मात्र एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्या अनुषंगाने प्रयत्नदेखील केले. सुरुवातीला सलग 16 वेळा अपयश मिळाले परंतु त्यांनी हार मानली नाही.
उषा यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण कोपरगावच्या नगरपालिका शाळेत झाले. त्यांनी इंग्रजी विषयात पदवी मिळवली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेतले. यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती पुण्याला गेली. अनेकदा तिने परीक्षा दिली. गेल्या 10 वर्षात तिने 16 वेळा परीक्षा दिली. सर्व परीक्षांमध्ये अपयश आले. पुढे पुण्यात खर्च भागत नव्हता, म्हणून संगमनेर येथे मैत्रिणीसोबत राहू लागली.लायब्ररीत जाऊन अभ्यास केला. शेवटी त्यांच्या मेहनतीचे यश झाले. MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि जगातला सर्वोच्च आनंद घेऊन आला. उषा उत्तीर्ण झाल्याचे कळताच तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. हे अश्रू केवळ यशाचे नव्हते, तर आई आणि भावाच्या अथक परिश्रमांचे ‘सोनं’ झाल्याचे समाधान त्यात दडलेले होते.

एमपीएससी परीक्षेत अनुसुचित जाती संवर्गातून उषाने 14 वी रँक प्राप्त केली. आता तिला क्लास 1 पद मिळण्याची शक्यता आहे. या बातमीमुळे सुभाषनगरसह संपूर्ण कोपरगाव शहरात आनंदाची लाट पसरली. नागरिकांनी मोठ्या संख्येने उषाच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले.




