spot_img

Nashik Tapovan Tree Cutting : नाशिकच्या तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, अभिनेते सयाजी शिंदे संतापले

spot_img

सयाजी शिंदे यांनी तपोवनातील लहान झाडं तोडता कामा नये, अशी भूमिका घेतली आहे. 

झाडं ही आमची आईबाप आहेत. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही. मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांची जनभावना समजूत घेतली पाहिजे. तपोवनात काढण्यात आलेले टेंडर्स चुकीचे आहेत. त्यामुळे तपोवनातील झाडं (Nashik trees) वाचवण्यासाठी नाशिकमध्ये जे आंदोलन, लढा उभा राहिलाय, त्याला माझा पाठिंबा आहे, असे वक्तव्य अभिनेते आणि सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी केले. ते शनिवारी नाशिकमधील तपोवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

सयाजी शिंदे यांनी तपोवनातील लहान झाडं तोडता कामा नये, अशी भूमिका घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत परखडपणे भाष्य करताना म्हटले की,साधू आले, गेले तरी त्याने काही फरक पडत नाही. याविषयी माझा अभ्यास नाही. पण झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल. इथलं एकही झाड तुटता कामा नये. ही सगळी झाडं वाचली पाहिजेत, असे सयाजी शिंदे यांनी म्हटले. आपल्याच माणसांनी आपल्याला फसवलं तर त्यांना आपलं कसं म्हणायचं, शासन आपलं आहे की, इंग्रजांचं राज्य आहे? आपल्याला झाडांची वयाची व्याख्याच माहिती नाही, तशी व्याख्या करणं महाराष्ट्र सरकारला जमलेले नाही. आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड आहे. हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय. ही मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देणारी असतात, त्यांची मोठी पानं जास्त कार्बन घेतात, ऑक्सिजन देतात. वडाच्या झाडावर पाचशे सहाशे प्रजाती जगतात. अशी झाडं तोडली तर त्याला माफी नाही. झाडं ही आपली आईबाप आहेत. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही मुलं काही इतकी बुळगी नाही. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी सयाजी शिंदे यांनी दिला.

कालच मला समजलं की, तपोवनात एक्झिबिशन सेंटर उभारले जाणार आहे. त्यादृष्टीने पुढील 30-35 वर्षांसाठी टेंडर्स काढण्यात आली आहेत. गिरीश महाजनांनी यावर उत्तर दिले पाहिजे. ते जबाबदार व्यक्ती आहेत. आपली वैयक्तिक दुश्मनी नाही. दुश्मनी झाली तरी त्याने मला फरक पडत नाही. 14 नोव्हेंबरला याठिकाणी एक्झिबिशन सेंटर उभारण्याची ऑर्डर काढण्यात आली. मग या सगळ्यात कुठला साधूग्राम आणि कुठला कुंभमेळा आला, असा सवाल सयाजी शिंदे यांनी विचारला. चांगली माणसं ही साधू संत असतात. एका जागेत 10 माणसे राहू शकतात. हजार आले तर ते साधू नाहीत. सर्व नाशिककरांनी एकत्र आले पाहिजे, एकही काडी इथून उचलून देऊ नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. जनभावना काय आहे हे बघितलं पाहिजे, असेही सयाजी शिंदे यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ