दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिलक ठरला पहिला भारतीय
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरच्या लढतीत भारतीय संघाने वर्चस्व गाजवत दणदणीत विजय मिळवला. भारताने उभारलेल्या २३० पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २०१ धावांपर्यंतच मजल मारता आली. परिणामी भारताने हा सामना ३० धावांनी जिंकत मालिका ३-१ अशी आपल्या नावावर केली.
या सामन्याचा खरा नायक ठरला मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्मा. त्याने ७३ धावांची जबरदस्त खेळी साकारत संघाच्या धावसंख्येला भक्कम आधार दिला. या खेळीदरम्यान तिलकने एक मोठा वैयक्तिक टप्पाही गाठला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याचा मान त्याने मिळवला.
यापूर्वी हा विक्रम रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर होता. रोहितने २००७ ते २०२४ या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १८ टी-२० सामन्यांत ४२९ धावा केल्या होत्या. मात्र तिलक वर्माने अवघ्या १० सामन्यांत ४९६ धावा करत हा विक्रम मागे टाकला. रोहितचा विक्रम मोडण्यासाठी तिलकला केवळ ७ धावांची गरज होती आणि सातव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने हा ऐतिहासिक क्षण गाठला.
जागतिक पातळीवर पाहता, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचा माजी कर्णधार जोस बटलरकडे आहे. त्याने २३ सामन्यांत ६०६ धावा केल्या आहेत. या यादीत त्यानंतर पाकिस्तानचा बाबर आझम आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो यांचा क्रमांक लागतो. तिलक वर्मा आता चौथ्या स्थानावर पोहोचला असून भारतीय क्रिकेटसाठी ही निश्चितच अभिमानास्पद कामगिरी आहे.




