भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड आमने सामने आले असून बांगलादेशनं आयपीएलच्या प्रक्षेपणावर आणि प्रसारावर बंदी घातलेली आहे. याशिवाय आगामी टी 20 वर्ल्ड कपचे बांगलादेशचे सामने भारतात न खेळवता श्रीलंकेत खेळवण्याची मागणी केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं याबाबतचं पत्र आयसीसीला लिहिलं होतं. यानंतर आयसीसीनं बीसीसीआय आणि बीसीबी यांची चर्चा घडवून आणली आहे. यानंतर आयसीसीच्या सूचनेनुसार बांगलादेश क्रिकेट बोर्डानं मॅचेसच्या ठिकाण बदलाच्या आग्रहावर पुनर्विचार करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.
द टेलीग्राफ नुसार बीसीसीआय आणि बीसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये काही बैठका झाल्या आहेत. यामध्ये आयसीसीनं मध्यस्थी केली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डानं ठिकाण बदलाबाबतच्या मागणीचा पुनर्विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे. मात्र, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं त्यांच्या देशातील सरकारच्या सल्ल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं. आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये बांगलादेशसाठी वेळापत्रकात बदल करण्यास तयार आहे. आयसीसीनं बांगलादेशच्या खेळाडूंना भारतात पूर्ण सुरक्षा देण्याचं आश्वासन दिलं आहे. रिपोर्टनुसार आयसीसीसी संबंधित एका अधिकाऱ्यानं म्हटलं की ते बांगलादेशनं भारतात टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) चे सामने खेळावेत यासाठी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरु आहेत. अधिकाऱ्यांच्यानुसार हा प्रश्न केवळ दोन संघांचा नसून चाहते, प्रेक्षक, ब्रॉडकास्टर्स आणि मीडियाचा देखील आहे.
आयसीसी (ICC) प्लॅन बी देखील लागू करु शकते. मात्र, बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डानं आपापसात चर्चा करुन हा प्रश्न सोडवावं, असं आयसीसीला वाटतं. द टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार हे देखील बीसीबीनं जरी बीसीसीआयसोबत पंगा घेतला तरी बांगलादेश क्रिकेट बोर्डाला भविष्यात मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. सूत्रांच्या माहितीनुसार सर्व क्रिकेट बोर्डांना माहिती आहे की भारताबरोबर मॅच झाल्यास त्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यामुळं सर्व क्रिकेट बोर्ड बीसीसीआय सोबत चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करतात. टी 20 वर्ल्ड कपच्या सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे सामने मुंबई आणि कोलकाता येथे होणार आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारच्या मागणीनुसार त्यांच्या मॅचेस श्रीलंकेला स्थलांतरित केल्यास लॉजिस्टिक्सच्या दृष्टीनं समस्या निर्माण होऊ शकतात. याशिवाय स्पर्धा आयोजक आणि ब्रॉडकास्टर्ससाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.




