सूर्या ब्रिगेडवर दुहेरी दबाव; पराभव झाल्यास स्टार खेळाडूंचे करिअर धोक्यात?
आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ आता एका अत्यंत रोमांचक वळणावर येऊन पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मानहानीकारक पराभवानंतर, भारतीय संघ आज (२६ फेब्रुवारी) चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झिम्बाब्वेविरुद्ध भिडणार आहे. भारतासाठी हा सामना केवळ विजय मिळवण्यापुरता मर्यादित नसून, सेमी फायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी ‘लाईफलाईन’ ठरणार आहे. मात्र, केवळ स्वतःचा विजय पुरेसा नाही; भारताला दुपारी होणाऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करावा, अशी प्रार्थनाही करावी लागणार आहे. वेस्ट इंडिजचा नेट रनरेट भारतापेक्षा सरस असल्याने टीम इंडियावर प्रचंड दबाव आहे.
या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघातील चार प्रमुख खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. नंबर १ टी-२० फलंदाज अभिषेक शर्मा या वर्ल्ड कपमध्ये पूर्णपणे अपयशी ठरला असून, त्याने ४ सामन्यांत केवळ १५ धावा केल्या आहेत. तिलक वर्मा आणि रिंकू सिंग यांच्या बॅटमधूनही अपेक्षित धावा निघत नसल्याने त्यांच्या जागी श्रेयस अय्यर किंवा यशस्वी जयस्वाल यांना संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. खुद्द कर्णधार सूर्यकुमार यादव याने १८० धावा केल्या असल्या तरी, त्याच्या नैसर्गिक शैलीत तो खेळताना दिसत नाहीये. जर आज भारताचा पराभव झाला, तर केवळ वर्ल्ड कपचे स्वप्नच भंगणार नाही, तर अनेक वरिष्ठ खेळाडूंचे टी-२० करिअर कायमचे संपुष्टात येण्याची भीती वर्तवली जात आहे.




