ICC–PCB बैठकीनंतर तोडगा; हायब्रीड मॉडेलवर सहमती, प्रायोजकांना मोठा दिलासा
आयसीसी टी-20 वर्ल्ड कपला सुरुवात झाल्यानंतर क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना अखेर निश्चित झाला असून, हा सामना 15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवण्यात येणार आहे. भारत–पाकिस्तान सामना न झाल्यास प्रायोजक, प्रक्षेपक आणि आयसीसीला मोठं आर्थिक नुकसान झालं असतं. त्यामुळेच या सामन्याबाबत तोडगा निघणं सर्वांसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे.
लाहोर येथे झालेल्या आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्यातील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पाकिस्तानसह बांगलादेशनेही आयसीसीसमोर काही मागण्या मांडल्या होत्या. त्यापैकी काही मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
टी-20 वर्ल्ड कपमधून वगळण्यात आलेल्या बांगलादेशला भरपाई देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली होती. आयसीसीने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून, भविष्यात अंडर-19 वर्ल्ड कप किंवा महिला क्रिकेट वर्ल्ड कपच्या आयोजनाची जबाबदारी बांगलादेशला देण्यात येऊ शकते. दरम्यान, पाकिस्तानने आयसीसीकडून मिळणाऱ्या महसुलातील वाटा वाढवण्याची मागणीही केली होती. सध्या पाकिस्तानला आयसीसीकडून 5.75 टक्के महसूल मिळतो, जो अंदाजे 34 ते 35 दशलक्ष अमेरिकी डॉलर इतका आहे. आयसीसीने या मागणीवर विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 नंतर कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही. पाकिस्तानकडून ही मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, आयसीसीने हा निर्णय आपल्या कार्यकक्षेबाहेर असल्याचं सांगत ही मागणी फेटाळली आहे. टी-20 वर्ल्ड कपदरम्यान भारत–पाकिस्तान सामना त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यावर दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांमध्ये आधीच हायब्रीड मॉडेलवर सहमती झाली होती, त्यानुसार हा सामना कोलंबोत होणार आहे.




