२८ जानेवारीच्या त्या काळरात्रीने लाडका नेता हिरावला; स्मृतींना उजाळा देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्राचे लाडके नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला आज दोन महिने पूर्ण झाले आहेत. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान लँड होत असताना झालेल्या भीषण अपघातात ‘दादां’नी जगाचा निरोप घेतला होता. या धक्क्यातून महाराष्ट्र आजही सावरलेला नाही. आज त्यांच्या दोन महिन्यांच्या स्मृतीनिमित्त, त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. “काळ पुढे सरकतोय, पण मन अजूनही तुमच्याच आठवणींमध्ये गुंतून राहिले आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कार्यपद्धतीचा गौरव केला आहे. त्या म्हणतात की, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे नेताना प्रत्येक पावलावर दादांचे मार्गदर्शन आणि त्यांची दूरदृष्टी आठवते. “लोककल्याणासाठी निर्णय घेताना तुम्ही या परिस्थितीत काय केले असते, हा विचार करूनच मी पुढचे पाऊल उचलते,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या विचारांचा वारसा अखंड सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अजित पवारांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, मात्र त्यांनी दिलेली शिकवण आणि मूल्ये हेच आता पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारे ‘दीप’ आहेत, अशा शब्दांत सुनेत्रा पवारांनी आपल्या जोडीदाराला श्रद्धांजली अर्पण केली आहे.




