सोलापूर (Solapur) मधील जुना पुणे नाका परिसरातील भाग्यलक्ष्मी लॉजमध्ये एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. हरिष भास्कर बंडी (Harish Bhaskar Bundy) असं या दुर्दैवी तरुणाचं नाव असून, त्याच्या या टोकाच्या पावलामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नाला नकार देऊन अपमान केल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. हरिषचे एका तरुणीवर प्रेम होते. त्याच्या कुटुंबीयांनी त्या मुलीच्या घरी जाऊन लग्नाची मागणी सुद्धा घातली होती, मात्र मुलीच्या वडिलांना ते मान्य नव्हते. उलट अपमानास्पद वागणूक दिल्याने हरिष प्रचंड नैराश्यात गेला होता. बुधवारी तो घराबाहेर पडला आणि त्यानंतर त्याचा मोबाईल बंद लागला.
हरिषने जुना पुणे नाका येथील लॉजमध्ये 120 क्रमांकाची रूम भाड्याने घेतलेली. शनिवारी त्या रूममधून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने लॉज प्रशासनाने तातडीने पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिले असता, हरिषने पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेतल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो हॉस्पिटलमध्ये हलवला.मुलीच्या आई-वडिलांच्या आडमुठेपणामुळेच हरिषने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या पालकांनी केला असून या मृत्यूला त्यांनाच जबाबदार धरले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सोलापूरमधील नीलम नगर परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. प्रेमात मिळालेल्या नकारातून तरुणाने उचललेले हे पाऊल समाजासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून लॉजमधील सीसीटीव्ही (CCTV) आणि हरिषच्या मोबाईलची तपासणी केली जाण्याची शक्यता आहे.




