सोलापूर (Solapur) शहर पुन्हा एकदा हादरलं आहे. समाधान नगर परिसरात घडलेल्या खुनाच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास वंडरलँड सिटी शेजारील एका बिअर शॉपीजवळ 39 वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव शेकुंबर महिबूब नदाफ, वय 39, राहणार समाधान नगर, सोलापूर असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्री शेकुंबर नदाफ यांचा श्रीकृष्ण देशमुख व मल्लीनाथ माशाळे यांच्याशी चेष्टा-मस्करीतून मोबाईल देण्या-घेण्याच्या कारणावरून वाद झाला. सुरुवातीला झालेला किरकोळ वाद क्षणातच हिंसक वळणावर गेला. मल्लीनाथ माशाळे याने शेकुंबरला हाताने चापटा मारल्या, तर श्रीकृष्ण देशमुख याने शिवीगाळ करत रागाच्या भरात मोठा दगड उचलून थेट शेकुंबरच्या डोक्यात मारला. या गंभीर मारहाणीत शेकुंबर जागीच बेशुद्ध पडला आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे.




