चांदीला केवळ दागिना न मानता अध्यात्म आणि ज्योतिष शास्त्रात अत्यंत पवित्र स्थान दिले गेले आहे. प्रत्येक धातूचा संबंध कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी असतो आणि चांदी थेट चंद्र आणि शुक्र ग्रहावर प्रभाव टाकते. ज्योतिष शास्त्रात चंद्राला मन,माता आणि मानसिक शांततेचा कारक मानले जाते, तर शुक्र वैभव आणि भौतिक सुखांचा स्वामी आहे. जेव्हा कुंडलीत चंद्र कमकुवत असतो किंवा शुक्र ग्रहाची दशा असते,तेव्हा चांदीची अंगठी किंवा कडा घालण्याचा सल्ला दिला जातो. मात्र चांदी सर्वांसाठीच शुभ नसते. चांदी कोणत्या राशींसाठी वरदान ठरते आणि ती धारण करण्याचे नियम काय आहेत, याबाबत जाणून घेऊ.
चांदी (Silver) फक्त आपले सौंदर्यच वाढवत नाही, तर तिच्या प्रभावाने व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात उजळपणा येतो. चंद्र हा मनाचा स्वामी असल्याने चांदी घातल्याने मानसिक तणाव कमी होतो, एकाग्रता वाढते आणि स्वभावात सौम्यता येते. कुंडलीत चंद्र आणि शुक्राची स्थिती अशुभ असल्यास चांदी धारण करणे हा एक अचूक उपाय मानला जातो. शुक्र ग्रह भक्कम झाल्यामुळे चांदी धन, वैभव आणि ऐश्वर्य मिळवून देण्यास मदत करते, ज्यामुळे लक्ष्मीची कृपा टिकून राहते. आयुर्वेदानुसार चांदी शरीरातील पित्तदोष संतुलित करते आणि पचनसंस्थेलाही लाभ देते.
चांदी जरी थंड असली तरी तिचे शुभ फळ मिळवण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्योतिष (Astrology) शास्त्रानुसार कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांसाठी चांदी परिधान करणे विशेष भाग्याचे ठरते. शास्त्रानुसार पुरुषांनी उजव्या हातात आणि महिलांनी डाव्या हातात चांदीचा कंडा घालावा. जर तुम्हाला अंगठी घालायची असेल, तर सोमवारच्या दिवशी ती सर्वात लहान बोटात घालणे मानसिक शांततेसाठी उत्तम आहे.चांदी परिधान करण्यासाठी सोमवार आणि शुक्रवार हे दिवस सर्वात योग्य मानले जातात.




