हार्दिक-दुबेच्या वेगावर प्रश्नचिन्ह आणि कुलदीप यादवसाठी मोठी मागणी; रावळपिंडी एक्सप्रेसचा भारतीय संघाला घरचा आहेर
टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मिळालेल्या ७६ धावांच्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघावर चहूबाजूंनी टीका होत आहे. यातच आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने टीम इंडियाच्या रणनीतीवर आणि प्रामुख्याने दोन अष्टपैलू खेळाडूंवर सडकून टीका केली आहे.शोएब अख्तरच्या मते, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाचे मुख्य कारण हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांची कमकुवत गोलंदाजी ठरली. अख्तर म्हणाला हार्दिक आणि शिवम दोघेही ताशी १२० किमी वेगाने गोलंदाजी करतात. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर धाक निर्माण करण्यासाठी हा वेग पुरेसा नाही. त्यांना माल्कम मार्शल समजून शेवटच्या ओव्हर्ससाठी राखून ठेवणे ही गंभीर चूक होती. आफ्रिकन फलंदाजांनी त्यांच्या गोलंदाजीवर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. या दोघांनी मिळून ६७ धावा लुटवल्या आणि त्यांना केवळ एकच यश मिळाले.
शोएबने वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीवरही बोट ठेवले आहे. “वरुण हा भारताचा ट्रम्प कार्ड आहे, पण ज्या दिवशी तो चालत नाही, तेव्हा काय होते हे आफ्रिकेने दाखवून दिले,” असे तो म्हणाला. वरुणने ४ ओव्हरमध्ये ४७ धावा दिल्या. अख्तरने भारतीय व्यवस्थापनाला कळकळीची विनंती केली आहे की “झिम्बाब्वेविरुद्धच्या आगामी सामन्यात कुलदीप यादवला तातडीने संघात स्थान द्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याची ‘मिसिंग लिंक’ स्पष्टपणे जाणवली. कुलदीप हा खरा मॅच-विनर आहे.
या सामन्यात उपकर्णधार अक्षर पटेलला बाहेर बसवून वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आली होती. मात्र, सुंदर आणि वरुण चक्रवर्ती यांच्या शैलीत खूप साम्य असल्याने आफ्रिकेला खेळणे सोपे गेले, असे मत क्रिकेट तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. शोएबने देखील या बदलावर आश्चर्य व्यक्त केले आहे. २० ओव्हर्समध्ये १८७ धावांचा डोंगर उभा करणाऱ्या आफ्रिकेसमोर भारतीय गोलंदाजी पूर्णपणे हतबल दिसली, ज्याचा फटका आता वर्ल्ड कपच्या प्रवासात बसू शकतो.




