बुऱ्हानगरच्या सरपंचपदापासून आमदारकीपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास थांबला
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 67व्या वर्षी दुखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने नगर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बुऱ्हानगर गावच्या सरपंचपदापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास आमदार आणि माजी राज्यमंत्र्यापर्यंत पोहोचला होता. दूध व्यवसायातून आपली ओळख निर्माण करणाऱ्या कर्डिले यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर राजकारणात आपले स्थान पक्के केले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे सासरे होते.शिवाजीराव कर्डिले यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप अशा विविध पक्षांमधून सक्रिय राजकारण केले.
2009 मध्ये अपक्ष म्हणून पहिल्यांदा निवडणूक जिंकून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यात त्यांना यश मिळाले नाही. 2014 मध्ये पुन्हा आमदारकी मिळवत त्यांनी आपली लोकप्रियता सिद्ध केली, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रचारासाठी राहुरीत जाहीर सभा घेतली होती. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले, “शिवाजीराव कर्डिले यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. अनेकदा आमदार, राज्यमंत्री आणि अहिल्यानगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले लोककल्याणकारी कार्य कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबाला हे दुख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबाच्या दुखात सहभागी आहोत.” शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी आणि नगर जिल्ह्यातील जनता शोकसागरात बुडाली आहे. त्यांचे समाजकार्य आणि राजकीय योगदान सदैव स्मरणात राहील.




