आयपीएल संघातील निर्णयावरून हिंदू महासभेचा तीव्र विरोध; राजकीय आणि सामाजिक स्तरावर संताप
बॉलिवूड अभिनेता आणि आयपीएल संघाचा मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या मोठ्या वादात सापडला आहे. आपल्या आयपीएल (IPL) संघासाठी बांगलादेशी क्रिकेटपटू मुस्तफिझुर रहमानला संघात सामील करून घेतल्याच्या निर्णयामुळे त्याच्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने अनेक संघटना आणि नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप नेते संगीत सोम यांच्या विधानानंतर हा वाद अधिक चिघळला. हिंदू महासभेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शाहरुख खानवर गंभीर आरोप करत उघड विरोध केला आहे. याचदरम्यान, हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्ष मीरा राठोड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे वातावरण आणखी तापले आहे.
या प्रकरणात धार्मिक नेते दिनेश फलाहारी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पत्र लिहून शाहरुख खानवर कठोर आरोप केले. बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या हिंसाचाराची माहिती असूनही शाहरुख खानने बांगलादेशी खेळाडूला मोठी रक्कम देऊन संघात घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शाहरुख खानचे बांगलादेशातील संशयास्पद घटकांशी संबंध असू शकतात, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे. देशातील अशा व्यक्तींची यादी तयार करून त्यांना बांगलादेशात पाठवावे, अशी मागणीही त्यांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात वाढलेल्या हिंसाचाराच्या घटनांमुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. हिंदू समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक कलाकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे. अशा संवेदनशील काळात शाहरुख खानने बांगलादेशी खेळाडूची निवड केल्याने जनतेतील असंतोष अधिक तीव्र झाला आहे. या संपूर्ण वादात बीसीसीआयची भूमिका काय असणार, याकडेही आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




