पहिल्या चार सामन्यात अपयश, इरफान पठाणचं समर्थन, तर इशान किशनची एन्ट्री पुन्हा शक्य
टीम इंडियाच्या T20 संघाची घोषणा झाली की दरवेळी चर्चेच्या केंद्रस्थानी एक नाव असतं संजू सॅमसन (Sanju Samson). गेल्या काही वर्षांपासून संजूची निवड आणि त्याला मिळणाऱ्या संधींबाबत सतत वाद रंगताना दिसतात. काहींच्या मते संजूवर अन्याय होतो, तर काहींना त्याच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव खटकतो. त्यामुळेच संघ व्यवस्थापनाकडून त्याच्यावर पूर्ण विश्वास दाखवला जात नसल्याचं चित्र आहे.
आता T20 वर्ल्ड कप अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत संजूचा सध्याचा फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतील पहिल्या चार सामन्यांत संजूला सलग संधी मिळाल्या, मात्र त्यातून तो अपेक्षित प्रभाव टाकू शकलेला नाही. या सामन्यांत त्याची धावसंख्या अनुक्रमे 10, 6, 0 आणि 24 अशी राहिली आहे.
आज होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या सामन्यात संजूला संधी मिळाल्यास ती त्याच्यासाठी ‘करो किंवा मरो’ची लढत ठरू शकते. कारण त्यानंतर थेट वर्ल्ड कप सुरू होणार असून संघ व्यवस्थापनाकडे प्रयोग करण्यासाठी फारसा वेळ राहणार नाही. अशावेळी विजय मिळवून देणाऱ्या संयोजनालाच प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे.
आशिया कपदरम्यान शुबमन गिलच्या संघात पुनरागमनानंतर संजूला ओपनिंगची जागा गमवावी लागली होती. मात्र गिलने T20 फॉरमॅटमध्ये अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे निवड समितीने त्याला वर्ल्ड कप संघातून वगळण्याचा कठोर निर्णय घेतला. त्यानंतर संजूला पुन्हा सलामीवीर म्हणून संधी मिळाली आहे. आता ही संधी तो कितपत साधतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, संजूच्या समर्थनार्थ माजी अष्टपैलू इरफान पठाण पुढे आला आहे. संजूला वरच्या फळीत सातत्याने खेळवायला हवं, असं त्याचं स्पष्ट मत आहे. मधल्या फळीत खेळवणं हा चुकीचा निर्णय होता आणि त्यामुळेच संजूवर अन्याय झाला, असं इरफानने म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्याने इशाराही दिला आहे की, जर संजूचा संघर्ष असाच सुरू राहिला तर संघ व्यवस्थापन पुन्हा इशान किशनकडे वळू शकतं.
इशान किशन पूर्णपणे तंदुरुस्त असून तिलक वर्माही दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे संजूची जागा सुरक्षित नाही. अशा परिस्थितीत न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा सामना संजू सॅमसनच्या T20 वर्ल्ड कपच्या प्रवासाची दिशा ठरवणारा ठरू शकतो.




