राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटींमुळे राजकीय चर्चांना उधाण
संजय राऊत यांचे काँग्रेससह युतीबाबत सूतोवाचमहाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या वारंवार होणाऱ्या भेटींमुळे ही चर्चा आणखी पेटली आहे. 5 जुलैच्या मेळाव्यापासून सुरू झालेल्या या भेटीगाठी, कधी एखाद्या कार्यक्रमात, तर कधी एकमेकांच्या निवासस्थानी होताना दिसत आहेत. यामुळे आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू युती (Thackeray brothers alliance) करणार असल्याच्या अटकळींना बळ मिळाले आहे. तरीही, दोन्ही नेत्यांनी याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.या सगळ्यामध्ये आता एक नवी चर्चा समोर आली आहे.
मनसे आणि शिवसेनेच्या युतीपुरतं हे न राहता, मनसेला महाविकास आघाडी (मविआ) मध्ये सामील करण्याबाबत बोलणं सुरू झालं आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना मोठं विधान केलं. ते म्हणाले की, स्वत: राज ठाकरे यांना मविआतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेण्याची इच्छा आहे. “महाराष्ट्रात प्रत्येक पक्षाचं स्वत:चं स्थान आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार गट), डावे पक्ष आणि काँग्रेस हे सगळे महत्त्वाचे आहेत. कोणताही निर्णय घेताना काँग्रेसचा समावेश असणं गरजेचं आहे, ही आमची आणि राज ठाकरे यांचीही भूमिका आहे,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं.
मात्र, याबाबत अंतिम निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी सांगितलं.राऊत यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावरही सूचक टिप्पणी केली. “काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत आहे, त्यांना इथे निर्णय घेण्याचा अधिकार नाही. ज्यांचं नेतृत्व दिल्लीत आहे, ते दिल्लीतच निर्णय घेतील,” असं त्यांनी नमूद केलं. या सर्व घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची उत्सुकता निर्माण झाली आहे. ठाकरे बंधू आणि मविआ यांच्यातील संभाव्य युती कशी आकार घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.




