सांगलीच्या तासगाव तालुक्याच्या राजकारणात आर. आर. आबांच्या पश्चात आमदार रोहित पाटील यांनी आपली पकड मजबूत केली होती. मात्र, अलीकडेच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत संजय पाटील यांच्या ‘स्वाभिमानी विकास आघाडी’ने रोहित पाटील यांच्या गटाला धक्का दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत रोहित पाटील आपला बालेकिल्ला राखणार की संजय पाटील पुन्हा बाजी मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं होतं.
या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये थेट लढत झाली असून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (घड्याळ चिन्ह) समोरासमोर उभे होते. रोहित पाटील यांनी गावोगावी बैठका घेऊन संघटना मजबूत केली असली, तरी संजय पाटील यांनी महायुतीच्या माध्यमातून भाजप आणि शिवसेनेची शक्ती एकत्रित केली आहे. या दोन ‘शक्तिपीठां’मधील संघर्षामुळे प्रत्येक गटात विजयाचे गणित लावणे कठीण झालं होतं. जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांनी सर्वस्व पणाला लावलं होतं. ही निवडणूक केवळ स्थानिक नसून, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.




