अपघाताबाबतच्या शंका, विलीनीकरण आणि अजित दादांची शेवटची इच्छा पत्रकार परिषदेत मांडणार सत्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, त्यांच्या विमान अपघाताबाबत विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी महत्त्वाचं विधान करत येत्या काही दिवसांत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
अजित पवार मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी निघाले असताना त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात मोठा स्फोट होऊन सर्वांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, अजित पवार यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येताना दिसत आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी स्पष्ट केलं की, विमान अपघाताबाबत मनात असलेल्या शंका आणि प्रश्नांवर 10 तारखेला मुंबईत पत्रकार परिषद किंवा प्रेझेंटेशनद्वारे सविस्तर माहिती देणार आहेत. अपघात नेमका कसा घडला, त्यामागे काय कारणं असू शकतात, यावर ते उघडपणे बोलणार आहेत.
तसेच 12 तारखेला अजित पवार यांची विलीनीकरणाबाबत नेमकी काय इच्छा होती, त्या संदर्भातील संपूर्ण घटनाक्रम पत्रकार परिषदेत मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 12 तारखेचं महत्त्व सांगताना रोहित पवार म्हणाले की, त्या दिवशी अजित दादांची एक खास इच्छा होती आणि त्याच संदर्भात ते बोलणार आहेत.
रोहित पवार यांनी भावनिक प्रतिक्रिया देत सांगितलं की, अजूनही कुटुंबातील कोणीही या दुःखातून सावरलेलं नाही. “सुनेत्रा काकी, पार्थ, जय किंवा आम्ही — कोणीही सध्या राजकीय विचार करू शकत नाही. ही घटना इतकी दुर्दैवी आहे की राजकारण मनात येणंही कठीण आहे,” असं त्यांनी म्हटलं.
तसेच अमोल मिटकरी यांच्याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, ते अजित दादांचे जवळचे कार्यकर्ते होते. काही मुद्दे ते योग्य पद्धतीने मांडत असले तरी काही ठिकाणी भावनिक झाल्यामुळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या सर्व प्रश्नांची उत्तरं योग्य पुराव्यांसह पत्रकार परिषदेत दिली जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.




