कोकणातील सांस्कृतिक वारसा जिवंत ठेवण्यासाठी पत्नीची ठाम भूमिका, भावनिक व्हिडिओतून केला खुलासा
महाराष्ट्राच्या मनात घर करून असलेल्या युट्यूब चॅनेल ‘रेड सॉईल स्टोरीज’मधील शिरीष गावस (Shirish Gawas) यांच्या अकाली निधनाने लाखो चाहत्यांच्या हृदयात दुखापत झाली. मात्र, त्यांच्या पत्नी पूजा गावस (Pooja Gawas) यांनी आता या चॅनेलला नव्या उमेदीने पुढे चालवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या भावनिक व्हिडिओतून पूजा यांनी शिरीष यांच्या आजारपणाचा आणि निधनाचा सविस्तर खुलासा करत, चुकीच्या माहिती पसरवणाऱ्या युट्यूबर्सवर कडाक्याची टीका केली आहे. हा चॅनेल कोकणातील पारंपरिक पदार्थ आणि ग्रामीण जीवनशैलीचे जगभरात प्रदर्शन करणारा होता, आणि आता तो पुन्हा सुरू होण्याची बातमी चाहत्यांसाठी आनंदाची ठरली आहे.पूजा यांनी व्हिडिओत सांगितले की, शिरीष यांच्या निधनानंतर काही लोकांनी त्याच्या मृत्यूचे भांडवल करून व्ह्यूज मिळवण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्या. “कुटुंबाला नजर लागली, डॉक्टरांच्या चुकीमुळे मृत्यू, सोशल मीडियाच्या अतिवापराने ब्रेन ट्यूमर किंवा चॅनेल बंद होईल अशा भडक शीर्षकांनी बातम्या चालवल्या गेल्या. आम्हाला संपर्क साधला नाही, तरीही आमच्या सुखी कुटुंबावर आरोप केले. या अफवांनी आमच्या दुःखात मीठ चुरचुरले,” अशी खेदाची आणि रागाची भावना त्यांनी व्यक्त केली. या व्हिडिओचा उद्देशच सत्य समोर आणणे असल्याचे पूजा यांनी स्पष्ट केले.शिरीष यांच्या आजाराची सुरुवात मार्च-एप्रिलमध्ये झाली होती. त्यांना वारंवार सर्दी आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी साइनसाइटिसचे निदान करून उपचार सुरू केले. मे महिन्यात ११ मिलिमीचा किडनी स्टोन आढळला, ज्याची छोटी शस्त्रक्रिया यशस्वी झाली. सर्जरीनंतर शिरीष यांची तब्येत सुधारली आणि ते मुलगी श्रीजाच्या (Shrija) पहिल्या वाढदिवसाच्या तयारीत मग्न झाले.
वाढदिवसाच्या दिवशी ते अतिशय आनंदी दिसत होते. स्टेंट काढण्यासाठी मुंबईला गेले, परत आल्यानंतर व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोडिंगपर्यंत काही त्रास नव्हता. मात्र, निधनाच्या १५ दिवस आधी अचानक उलटी, पिवळा रंग आणि चक्कर येणे सुरू झाले. पोटात अन्न टिकत नव्हते. जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्यांदा फिट आली. कुटुंबातील डॉक्टर सदस्यांच्या सल्ल्याने तात्काळ गोव्यातील नामांकित रुग्णालयात न्यूरोसर्जनकडे नेले. तिथे सतत फिट्स येत होत्या. सीटी स्कॅनमध्ये मेंदूत गाठ आणि पाणी साठलेले असल्याचे उघड झाले. ब्रेन ट्यूमरचे निदान ऐकून कुटुंब हादरले. मुंबईतील तज्ज्ञांशी संपर्क साधला, पण मुसळधार पावसामुळे रस्ता प्रवास अशक्य आणि एअर अॅम्बुलन्समध्ये बेशुद्ध रुग्ण शिफ्ट करता येत नसल्याने गोवा मेडिकल कॉलेजकडे वळले.तिथे दोन-तीन तासांत शिरीष कोमात गेले. डॉक्टरांनी तात्काळ ऑपरेशन करून डोक्यातील पाणी काढले आणि रक्ताच्या गाठीही दूर केल्या. दोन दिवसांनंतर ते शुद्धीवर आले, कुटुंब ओळखू लागले. सकारात्मक वातावरण निर्माण झाले. चार दिवसांत स्थिरतेनंतर ट्यूमरची शस्त्रक्रिया ठरली. मुंबईतील तज्ज्ञांकडून हिरवा सिग्नल मिळाला. ७-८ तासांच्या जोखमीच्या शस्त्रक्रियेत २०-३० टक्के ट्यूमर काढण्यात यश आले, कारण तो मेंदूच्या नाजूक भागात होता. पूर्ण काढणे धोकादायक असते, ज्यामुळे हालचाल, बोलणे किंवा स्मरणशक्तीवर परिणाम होऊ शकत होता.
सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड एसओएल हायड्रोसेफलस या गंभीर आजारामुळे पाणी साठले होते.शस्त्रक्रियेनंतर शिरीष यांची तब्येत सुधारू लागली. व्यायाम आणि औषधांना प्रतिसाद मिळत होता. पण चार-पाच दिवसांत ताप आला. चाचण्यांमध्ये युरिन आणि मेंदूच्या पाण्यात संसर्ग आढळला, जो मोठ्या शस्त्रक्रियांमध्ये सामान्य असतो. संसर्ग रोखणे कठीण होते. आयसीयूत शिफ्ट करून उपचार चालू ठेवले, पण हळूहळू ते पुन्हा बेशुद्ध झाले आणि पाच दिवसांत कायमचे निघून गेले. “जुलैमध्ये फिट आली आणि अवघ्या १५ दिवसांत शिरीष आम्हाला सोडून गेला. तल्लख बुद्धीचा हा माणूस मेंदूच्या आजाराने का गडबडला, हे समजतच नव्हते,” असे पूजा यांनी सांगितले. या घटनेने कुटुंबाबरोबरच महाराष्ट्र आणि जगभरातील लाखो अनुयायी हळहळले.शिरीष यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पूजा यांचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. चॅनेल पुन्हा सुरू होण्याने कोकणातील सांस्कृतिक धागा कायम राहणार आहे, आणि चुकीच्या अफवा थांबवण्यासाठी हा व्हिडिओ मैलाचा दगड ठरेल.




