“रस्त्यावर बोटिंगच करावं लागतं”; जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचीही सहमती
बॉलिवूडची ‘मस्त-मस्त’ गर्ल रवीना टंडन आपल्या बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे आणि सध्या तिच्या अशाच एका रोखठोक मुलाखतीची क्लिप सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मुंबईच्या रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाचा ढिसाळ कारभार यावर रवीनाने अत्यंत धारदार शब्दांत टीका केली आहे. “मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे हे मंत्र्यांच्या खिशांसारखे आहेत, जे कधीच भरले जात नाहीत,” अशा शब्दांत तिने आपल्या संतापाला वाट करून दिली आहे. रवीनाची ही जुनी मुलाखत असली तरी, आजच्या घडीलाही मुंबईतील खड्ड्यांची परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने नेटकऱ्यांनी तिच्या विधानाचे जोरदार समर्थन केले आहे.
मुलाखतीदरम्यान गाड्यांच्या आवडीबद्दल विचारले असता, रवीनाने मुंबईत महागड्या गाड्या घेणं कसं व्यर्थ आहे, हे पटवून दिले. “कॉलेजमध्ये असताना माझ्याकडे स्पोर्ट्स कार होती, पण इथलं ट्रॅफिक आणि रस्ते पाहता आता चांगली गाडी घेण्याचा मोहच संपला आहे,” असे ती म्हणाली. रोड टॅक्सचा पैसा नेमका कुणाच्या खिशात जातो, असा सवाल करत तिने मुंबईच्या रस्त्यांची तुलना चक्क चंद्राच्या पृष्ठभागाशी केली. मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे इतके मोठे आहेत की तिथे गाडी ४० च्या वेगाने चालवणंही अशक्य असल्याचं तिने नमूद केलं.
रवीनाने १९९४ मधील एक किस्सा सांगताना म्हटले की, पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर इतकं पाणी साचतं की तिथे बोटिंग करावं लागतं. एका फोटोशूटसाठी चक्क बोटीचा वापर करावा लागल्याची आठवण सांगत तिने प्रशासकीय अपयशावर बोट ठेवले. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ३० वर्षांपूर्वीची रवीनाची ही निरीक्षणं आजही तंतोतंत लागू होतात. सोशल मीडियावर या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा मुंबईच्या पायाभूत सुविधांवरून चर्चांना उधाण आले असून, प्रशासनाविरुद्ध लोकांचा रोष व्यक्त होत आहे.




