तीन व्हिडीओ दाखवत मोदी सरकारच्या धोरणांवर सवाल, मुंबई-महाराष्ट्र वाचवण्याचं आवाहन
तब्बल दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर आलेल्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या सभेने शिवतीर्थ मैदान गाजून गेलं. या सभेत राज ठाकरेंनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करत “सरकार फक्त अदानी समूहालाच का झुकतं माप देत आहे?” असा थेट सवाल उपस्थित केला.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात 2014 नंतर अदानी समूहाने केलेल्या झपाट्याने वाढीचा लेखाजोखा मांडत मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील नागरिकांना सजग होण्याचं आवाहन केलं. यासाठी त्यांनी तीन वेगवेगळे व्हिडीओ सभेत दाखवले, ज्यांची सध्या देशभर चर्चा सुरु आहे.
पहिला व्हिडीओ – देशपातळीवरील वाढ
पहिल्या व्हिडीओत 2014 ते 2025 या अवघ्या 11 वर्षांत अदानी समूहाने विविध क्षेत्रांत कसा विस्तार केला, सरकारी पाठबळाच्या जोरावर कशाप्रकारे एकाधिकारशाहीकडे वाटचाल केली, हे चित्रण दाखवण्यात आलं.
दुसरा व्हिडीओ – महाराष्ट्रातील विस्तार
दुसऱ्या व्हिडीओत महाराष्ट्रात वीज, बंदरे, विमानतळ यांसह अनेक महत्त्वाची क्षेत्रे अदानी समूहाच्या ताब्यात कशी दिली जात आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला. “आज जर मराठी माणूस जागा झाला नाही, तर उद्या या राज्यातील जमिनीचा तुकडा-तुकडा एका उद्योगसमूहाकडे जाईल,” असा इशाराही राज ठाकरेंनी दिला.
तिसरा व्हिडीओ – मुंबई आणि एमएमआरचा मुद्दा
तिसऱ्या व्हिडीओत मुंबई महानगर प्रदेश (MMR) परिसरात अदानी समूहाचा वाढता प्रभाव दाखवण्यात आला. मुंबई महाराष्ट्राला मिळाल्याचा राग अजूनही काही शक्तींना असून, त्या अदानी समूहाच्या माध्यमातून मुंबई आणि एमएमआरवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
या तिन्ही व्हिडीओंमधून राज ठाकरेंनी देश, महाराष्ट्र आणि विशेषतः मुंबईच्या भवितव्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत, नागरिकांनी वेळीच विचार करून निर्णय घ्यावा, असं आवाहन केलं.




