सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, उकाडाही कायम
महाराष्ट्रासह देशातील बहुतांश भागातून मान्सून माघारी फिरला असला तरी पावसाचा मूड अजूनही गेलेला नाही. कोकण वगळता राज्यातील इतर भागात ऑक्टोबरच्या तप्त उन्हाने हैराण केले आहे. पण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण भारतात निर्माण झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे यंदा दिवाळीच्या सणावर पावसाचं सावट कायम राहण्याची शक्यता आहे. आज कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurag), सातारा (Satara) आणि कोल्हापूर (Kolhapur) या जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. मात्र, राज्याच्या इतर भागात उष्ण आणि कोरड्या हवामानामुळे घामाच्या धारा वाहण्याची शक्यता आहे.मुंबईत आज पाऊस नसला तरी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दमट हवेमुळे मुंबईकरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागेल. ठाणे (Thane)आणि नवी मुंबईतही हवामान कोरडं राहील, तर पालघरमध्ये (palghar) आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे, पण मुसळधार पावसाची शक्यता नाही.हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, त्यामुळे दक्षिण भारतात पुढील सात दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला थेट वादळाचा धोका नसला तरी हवामानात वेगाने बदल होऊ शकतात. कमी दाबाचं क्षेत्र लक्षद्वीपपासून पश्चिम बंगालच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. 19 ऑक्टोबरला देखील कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस कायम राहील, ज्यासाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी पावसाच्या सावटाखाली साजरी होण्याची शक्यता आहे.




