कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना थेट जोडणाऱ्या वैभववाडी–कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला महत्त्वाची गती मिळाली असून या १०८ किलोमीटर लांबीच्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून सादर करण्यात आला आहे.
या नव्या रेल्वेमार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणे अधिक सुलभ होणार आहे. नियोजित आराखड्यानुसार या मार्गावर उपळे, सैतवडे, कळे, भुई कसबा-बावडा, मार्केटयार्डसह एकूण १० स्थानके प्रस्तावित आहेत.
या रेल्वेमार्गावर गाड्या ताशी सुमारे ११० किलोमीटर वेगाने धावू शकतील, अशी योजना आहे. प्रकल्पासाठी सुमारे ६८३ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे.
करुळ घाट आणि भुईबावडा घाट टाळत वळसा घेत हा मार्ग आखण्यात आल्यामुळे काही प्रमाणात अंतर वाढणार असले, तरी प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार असल्याचे मानले जात आहे.




