मोठ्या वादानंतर प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी २’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असून, आता राजकीय स्तरावरूनही यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या चित्रपटावर निशाणा साधत याला निव्वळ ‘प्रोपेगेंडा’ आणि समाजात फूट पाडणारे एक ‘शस्त्र’ म्हटले आहे. कुरिक्कनम येथील मारियन कॉलेजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, चित्रपट आणि माध्यमांचा वापर चुकीच्या पद्धतीने द्वेष पसरवण्यासाठी केला जात असून, हा प्रकार देशाच्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी अत्यंत हानिकारक आहे.
केरळची खरी संस्कृती आणि परंपरा समजून न घेता अशा चित्रपटांद्वारे धर्मांतर आणि द्वेषाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. साधारण २८ ते ३० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत केवळ २५ कोटींची कमाई केली असून, प्रेक्षकांनी याकडे पाठ फिरवणे ही चांगली गोष्ट असल्याचेही गांधींनी नमूद केले. तीन मुलींच्या धर्मांतराच्या कथेभोवती फिरणाऱ्या या चित्रपटावर बंदीची मागणी झाली होती, मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर तो प्रदर्शित झाला असला तरी त्यावरून निर्माण झालेला तणाव अद्याप कायम आहे




