पुणे शहरात अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. जोरदार वाऱ्यासह ढगांचा गडगडाट आणि काळ्या ढगांच्या छायेमुळे दुपारच्या वेळेतच संध्याकाळसारखी स्थिती निर्माण झाली. गेल्या काही वेळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून, अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिल्यामुळे हा पाऊस पडत असल्याची माहिती समोर आली आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या गहू आणि हरभरा पिकांची काढणी सुरू असताना पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.




