आज महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकेसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. पण शाई (Ink) ऐवजी मार्कर पेनचा वापर केला जात असल्याने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाकडून देखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी शाई देखील पुसून दाखवली आहे. यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
दरम्यान, पुण्यातल्या धायरी परिसरात बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. इथं बाहेरून काही महिलांना आणून मतदान करून घेतलं जात आहे. शिवाय एका विशिष्ट लिक्विडचा वापर करून शाई देखील पुसली जात आहे. ही शाई पुसून पुन्हा या महिला मतदान करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केला आहे. धायरी परिसरातील एका बुथवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी संबंधित बोगस मतदान करणाऱ्या महिलेला पकडलं आहे. तिच्याकडून बोटावरील शाई पुसण्यासाठी वापरण्यात येणारं लिक्विड जप्त केलं आहे. कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली असून संबंधित लिक्विड देखील पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.याबाबत प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, प्रशासन कमी पडत आहे. प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने याकडे लक्ष द्यायला हवं होतं. काही महिला बोटाची शाई पुसून पुन्हा पुन्हा त्याच महिला मतदानाला जात आहेत. पण पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर होईल, असा आम्हाला विश्वास आहे.




