स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar ) यांनी भाजपाचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan ) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. अर्धापूर येथील पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना चिखलीकर म्हणाले, “मी कोणाच्या दबावाला बळी पडून पक्ष बदलला नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता असलो तरी स्वाभिमानी आहे. मी कधीही कुणापुढे झुकलो नाही आणि भविष्यातही झुकणार नाही. मी 18 निवडणुका लढलो, त्यापैकी 16 जिंकलो.
माझे वडील मंत्री किंवा खासदार नव्हते, मी कधीच मागच्या दाराने सत्तेच्या मार्गाला गेलो नाही.” या टिप्पणीने त्यांनी चव्हाण यांच्या राज्यसभेच्या प्रवेशावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.यापूर्वी अशोक चव्हाण यांनीही चिखलीकरांवर पलटवार केला होता. “काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय चैनच पडत नाही, हा त्यांचा प्रश्न आहे,” असा टोला चव्हाण यांनी लगावला होता. ते पुढे म्हणाले, “नांदेडला महाराष्ट्रातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये आणण्याची माझी इच्छा आहे. अशा टीकेला मी महत्त्व देत नाही, त्याचा माझ्यावर परिणामही होत नाही.” गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात चिखलीकर आणि चव्हाण यांच्यातील शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. यामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव उघड झाला असून, आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.




