पुण्यात निलेश घायवळ प्रकरणाची धग अजून कमी झाली नसतानाच आता केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यावर जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप होऊन खळबळ उडाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी थेट मोहोळ यांच्यावर निशाणा साधत त्यांचा गोखले बिल्डरशी संबंध असल्याचा दावा केला. यावर मोहोळ यांनी प्रसारमाध्यमांसमोर खुलासा करत आपली बाजू मांडली.मोहोळ म्हणाले, “राजू शेट्टी यांनी आरोप करण्यापूर्वी माझ्याशी एकदा बोलायला हवं होतं. मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती. जैन बोर्डिंग हाऊसची जमीन गोखले बिल्डरने विकत घेतली, करार आणि खरेदीखतही झालं. पण मी गोखले यांचा भागीदार आहे, असा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.” त्यांनी आपल्या निवडणूक प्रत माहिती जाहीर केल्याचा दावा केला.
ते पुढे म्हणाले, “मी शेती आणि बांधकाम व्यवसायात आहे. राजकीय व्यक्तीने व्यवसाय करू नये का? पुणेकरांच्या मनात कोणतीही शंका राहू नये, म्हणून मी हे स्पष्ट करतोय.”मोहोळ यांनी कागदपत्रे दाखवत सांगितले की, 25 नोव्हेंबर 2024 रोजी ते दोन्ही एलएलपी कंपन्यांमधून बाहेर पडले होते. डिसेंबर 2024 मध्ये जैन बोर्डिंगच्या विकासाचा निर्णय जैन मुनींच्या बैठकीत घेण्यात आला, तेव्हा ते आधीच या भागीदारीतून माघार घेऊन बाहेर पडले होते. याशिवाय, या प्रकरणातील टेंडर नोटीस अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले.“जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीचा निर्णय घेण्यापूर्वी 11 महिने आधीच मी एलएलपीमधून बाहेर पडलो होतो. मग माझा या प्रकरणाशी संबंध कसा येईल? पुण्यातील जैन समाजाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, आणि एकाही जैन बांधवाने माझ्यावर आरोप केलेला नाही,” असंही मोहोळ यांनी ठामपणे सांगितलं.या प्रकरणाने पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून, मोहोळ यांच्या खुलाशामुळे हे प्रकरण काय वळण घेतं, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.




