मुंबई-पुणे एक्सप्रेसवे (Mumbai-Pune Expressway) वरील आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकरच्या भीषण अपघातानंतर सुरू असलेली गॅस गळती अद्याप थांबलेली नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव एक्सप्रेसवे आणि जुना महामार्ग या दोन्ही मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलिसांनी प्रवाशांना लोणावळा-खंडाळा घाट क्षेत्रात न जाण्याचा कडक इशारा दिला आहे. तब्बल 20 तासांपासून वाहनांची मोठी रांग लागली आहे.
लोणावळा आणि खंडाळा एक्झिटवर सध्या वाहनांच्या प्रचंड रांगा आहेत. त्यामुळे या भागात अडकण्यापेक्षा पर्यायी मार्ग निवडा. ताम्हिणी किंवा माळशेज मार्गे जाताना प्रवासाचा वेळ वाढणार असल्याने गाडीत पुरेसे इंधन, पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत ठेवा.सर्व अवजड वाहनांना गॅस गळती थांबेपर्यंत नजीकच्या ‘फूड मॉल’ किंवा पार्किंगच्या ठिकाणी थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच खाजगी वाहनापेक्षा रेल्वे प्रवास सध्या सर्वात सोयीचा आहे. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस किंवा इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांवर या परिस्थितीचा कोणताही परिणाम झालेला नाही.




