महापौर निवड दिल्लीत नाही तर तांत्रिक प्रक्रियेत ठरणार, भाजप-शिवसेना-रिपाईमध्ये समन्वय कायम
मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरपदाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीला 118 जागांचे भक्कम बहुमत मिळाले असून या जागांच्या आधारे महापौरपदावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. भाजप, शिवसेना आणि रिपाई या तिन्ही पक्षांमधील नगरसेवकांपैकी आरक्षणानुसार योग्य उमेदवाराची निवड केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
देशाच्या विकासावर भाष्य करताना साटम म्हणाले की, मागील 11 वर्षांत भारताने मोठी झेप घेतली असून आज देश चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. येत्या काही वर्षांत भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यामुळे तरुणांमध्ये देशाबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली असून जेनझीचा मोठा पाठिंबा भाजपला मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
महापौरपदाचा निर्णय दिल्लीत होणार या चर्चांवर स्पष्टीकरण देताना साटम म्हणाले की, दिल्लीतील भेटी या गट स्थापना, गटनेता निवड आणि रजिस्ट्रेशनसारख्या तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी असतील.
स्थायी समितीवर भाजप दावा करणार का, या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, भाजपचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे तर समाजातील शेवटच्या माणसाच्या सेवेसाठी काम करतो.
महापौर भाजपचाच असेल का, या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली. महापौर कोणत्या पक्षाचा असेल यापेक्षा मुंबईचा विकास, पारदर्शक प्रशासन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी सुरक्षित शहर घडवणं हेच महत्त्वाचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.




