लोणावळ्याजवळील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर उलटल्याने हा अपघात झाला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातानंतर तब्बल 27 तासांहून अधिक काळ ट्रॅफिक जॅम कायम होता. रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक प्रवासी तासंतास अडकून पडले होते. या संपूर्ण प्रकारावर ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या लेखिका मुग्धा गोडबोले यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. मुग्धा यांनी लिहिलेल्या पोस्टची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
मुग्धा यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय, “भयंकर आहे. गेली तीस वर्ष मी सातत्याने हा प्रवास करते आहे. वेगवेगळ्या वाहनांमधून करते आहे. बस, ट्रेन, टॅक्सी, गाडी यापैकी त्या त्या वेळी जे सोयीचं असेल ते. सुरुवातीला 5-6 तास लागायचे. मध्ये कधीतरी तो ‘द्रुतगती’ झाला.”
“यात सातत्य इतरही गोष्टीत आहे. टोलची रक्कम वाढणे. वाढत जाणे. पण रस्ता तितका चांगला न राहणे.
चालकांनी नियम न पाळणे. त्याबद्दल कुणीही काहीही न करणे. कधीही कोणतीही सूचना न देता लेन्स बंद असणे. घाटात ट्रॅफिक जॅम असणे. ट्रक्स आणि टेम्पोने तिन्ही लेन्स ब्लॉक करून ठेवणे.”
लोणावळ्यातील ट्रॅफिक जॅमवर बोलत काही प्रश्न उपस्थित केलेत. पुढे लिहिलंय, “गेले दोन दिवस पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर जे झालं आहे हे अक्षम्य आहे. रस्त्याचे पदर वाढवायचे.. म्हणून टोल वाढवायचा.. तरीही हे असं कसं होतं?? बायकांना टॉयलेटला जाता आलं नसेल. गाडीत लहान मुलं, म्हातारी माणसं, आजारी माणसं, गरोदर बायका असतील. लोकांच्या visa appointments गेल्या, विमानं चुकली, प्रचंड आर्थिक नुकसान झालं.. हे वेळीच थांबवता आलं नसतं का? निर्णय घेऊन damage कमी करता आला नसता का? याला कोण जबाबदार आहे??”




