स्नेहल जाधव यांच्याकडून राज ठाकरे यांचेकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त
मुंबई : राज्यात अलीकडेच झालेल्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण पूरस्थिती निर्माण केली आहे. शेतीचा मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा फटका बसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या अस्मानी संकटाच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस सौ. स्नेहल सुधीर जाधव यांनी पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे (Raj Thackrey) यांना एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला. ही रक्कम मनसेच्या वतीने पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसन आणि तातडीच्या सहाय्यासाठी दिली जाणार आहे.
या प्रसंगी बोलताना सौ. स्नेहल जाधव (Snehal Jadhav) म्हणाल्या, जगाचा पोशिंदा जगला तर आपलं अस्तित्व टिकेल. शेतकऱ्याच्या (Farmer) घामावर देश उभा आहे. अशा काळात त्याच्याप्रती संवेदनशील राहणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.
सौ. स्नेहल जाधव म्हणाल्या, मनसे म्हणजे म : मदत, न : नव्हे, से : सेवा. समाजहितासाठी आणि गरजूंच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. राजसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतूनच आम्ही हा उपक्रम राबवला.
राजसाहेब ठाकरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की, मनसेचे कार्यकर्ते फक्त राजकारणापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारी पार पाडतात, हे मनसेच्या कार्यपद्धतीचे खरे वैशिष्ट्य आहे.
राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या घरे, पिके आणि जनावरे वाहून गेल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शासन आणि प्रशासनाकडून मदतीचे प्रयत्न सुरू असले तरी नागरिकांच्या, सामाजिक संस्थांच्या आणि राजकीय पक्षांच्या स्वयंस्फूर्त योगदानामुळेच या संकटावर मात करता येणार आहे.
मनसेच्या या मदतीच्या उपक्रमामुळे पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी भावना व्यक्त होत असून, समाजात “सेवा हाच धर्म” हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे.




