मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात शनिवारी दुपारी भीषण अपघात घडला. एलबीएस रोड वर सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या पिलरचा सिमेंटचा मोठा तुकडा अचानक तुटून खाली कोसळला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षा आणि कारवर आदळल्याने गंभीर दुर्घटना घडली. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली.
दुपारी सुमारे १२.२० वाजता संबंधित यंत्रणांना अपघाताची माहिती मिळाली. प्राथमिक माहितीनुसार, रिक्षामधील तीन ते चार प्रवासी जखमी झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून विरोधकांनी प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधत, या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल केला. एमएमआरडीए आणि संबंधित कंत्राटदारांवर कारवाई होणार का, तसेच सुरक्षेच्या नियमांचे पालन का झाले नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.
काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनीही सरकार आणि प्रशासनावर टीका करत, लोकवस्तीच्या भागात सुरू असलेल्या कामांमध्ये पुरेशी सुरक्षा का नव्हती, असा प्रश्न उपस्थित केला. “विकास हवा, पण तो नागरिकांच्या जीवावर बेतणारा नको,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही राज्यातील पायाभूत सुविधांच्या कामांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. वारंवार घडणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याची टीका त्यांनी केली.
ही दुर्घटना मेट्रो मार्ग ४ च्या बांधकामादरम्यान घडल्याचे सांगितले जात असून, सुरक्षाविषयक उपाययोजना आणि कामाच्या दर्जाबाबत आता नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून चौकशीचे आदेश दिले जाण्याची शक्यता असून, संबंधित कंत्राटदारांवर काय कारवाई होते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.




