शरद पवारांचा थेट सवाल – मतचोरीविरोधात एकत्र, मग निवडणूक वेगळी का?
मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागताच महाविकास आघाडीमध्ये नवी राजकीय कुरघोडी सुरू झाली आहे. मनसेला सोबत घ्यायचे की नाही, या मुद्द्यावर काँग्रेसने कठोर भूमिका घेतल्याने आघाडीत तणाव वाढला आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी मारहाण करणाऱ्या पक्षांसोबत आम्ही जाणार नाही, असा टोला मनसेला लगावला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीही त्यांना दुजोरा दिल्याने मनसे+महाविकास आघाडीचे स्वप्न धूसर झाले. त्यानंतर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी तर थेट मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढण्याचा नारा दिला, ज्यामुळे राजकीय चर्चांना चांगलाच ऊत आला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेमध्ये युतीची चर्चा कायम सुरू असली तरी अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याने उत्सुकता वाढली आहे.
शरद पवार (Sharad Pawar) यांनी मतचोरीविरोधात आपण सर्वजण एकत्र मोर्चा काढतो, मग निवडणूक मात्र का वेगळी लढतो? असा रोकडा प्रश्न विचारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांचा हा ‘वडिलकीचा सल्ला’ काँग्रेस मान्य करते का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे मनसेनेही आघाडीतील या घडामोडींवर प्रतिक्रिया देत मनसे हा महाविकास आघाडीचा भागच नाही, अशी ठाम भूमिका व्यक्त केली आहे. संदिप देशपांडे आणि राजू पाटील यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडत आपली नाराजी स्पष्ट केली. मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी पुन्हा एकदा मोठे राजकीय पेच निर्माण झाले आहेत. आता महाविकास आघाडीची वाट एकत्र जाते का विभक्त, याचा खुलासा येणाऱ्या काळात होणार आहे…!




