“तो प्रस्ताव आला होता, पण नातं जमलं नाही” – सुरेश वाडकरांनी सांगितली 90 च्या दशकातील न सांगितलेली गोष्ट
डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह होण्याआधी अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आयुष्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. बॉलिवूडमध्ये तिचं नाव अनेक नामवंत कलाकारांशी जोडलं गेलं, पण एकेकाळी सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे गायक सुरेश वाडकर यांच्यासोबतचं कथित लग्नप्रस्ताव.
माधुरीच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात तिच्या कुटुंबियांनी तिच्यासाठी योग्य स्थळ शोधण्यास सुरुवात केली होती. रिपोर्टनुसार, माधुरीनं सिनेसृष्टीत मोठं करिअर करावं, अशी तिच्या कुटुंबाची इच्छा नव्हती. तिने लग्न करून घर-संसारावर लक्ष केंद्रित करावं, असं त्यांना वाटत होतं. याच पार्श्वभूमीवर तिच्या पालकांनी सुरेश वाडकर यांच्या घरी विवाहाचा प्रस्ताव पाठवला होता.
एका कार्यक्रमात बोलताना सुरेश वाडकर यांनी याबाबत स्पष्ट खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं की, माधुरीच्या आई-वडिलांनी त्यांच्याशी भेट घेऊन ‘परिंदा’ चित्रपटाची कथा सांगितली आणि लग्नाचा विषयही मांडला. “माधुरीसोबत लग्न करून संसार थाटावा,” अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती, असं वाडकरांनी सांगितलं.
मात्र हा प्रस्ताव पुढे जाऊ शकला नाही. याबद्दल बोलताना सुरेश वाडकर म्हणाले होते, “आज हा कार्यक्रम माधुरी पाहत असेल तर कदाचित ती मला भेटली तर रागावेल. ती गोष्ट आजही अर्धवटच राहिलेली आहे—जणू एखादी पतंग हवेत अडकून राहिल्यासारखी. ती पतंग कोणी उडवली, हे आजही कळलं नाही.” त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “जर आमचं लग्न झालं असतं, तर ती आज माझ्यासोबत असती का?”
काही रिपोर्टनुसार, सुरेश वाडकर यांनी हा प्रस्ताव नाकारण्यामागे माधुरी खूप सडपातळ असल्याचं कारण दिलं होतं. यामुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला होता. त्यांना असं वाटू लागलं होतं की, माधुरीचं लग्न जुळणं कठीण होईल आणि जर तिने सिनेमांमध्ये काम सुरू ठेवलं, तर अडचणी आणखी वाढतील.
मात्र पुढे जे घडलं ते सगळ्यांनाच माहीत आहे. 1984 मध्ये ‘अबोध’ चित्रपटातून पदार्पण केलेल्या माधुरी दीक्षितने काही वर्षांतच बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं. ‘तेजाब’, ‘त्रिदेव’, ‘किशन कन्हैया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम तुम्हारे है सनम’ आणि ‘देवदास’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं.
शेवटी 1999 मध्ये माधुरीने अमेरिकेत स्थायिक असलेल्या डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. आज ती पती आणि दोन मुलांसह आनंदी कौटुंबिक आयुष्य जगत आहे.




