काँग्रेस (Congress)कडून आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं या टॅगलाईनखाली प्रचार मोहीम आखत जाहीरनामा मांडला. यानंतर आता कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडूनही ‘जे मनात तेच मनपात’ या टॅगलाईनखाली कर्तव्यनामा प्रसिद्ध करण्यात आला. या कर्तव्यनामाच्या माध्यमातून कोल्हापूरकरांसमोर राज्य व केंद्र सरकारच्या ताकदीवर आधारित निधी, योजना आणि ठोस प्रकल्पांचा आराखडा मांडण्यात आला आहे. या कर्तव्यनामावर बोलताना खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर आणि चंद्रकांत पाटील यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला.
धनंजय महाडिक यांनी सांगितले की, “आम्ही निवडणुकीत फक्त स्वप्न दाखवायला नाही तर मंजूर प्रकल्प घेऊन उतरलो आहोत.” अंबाबाई मंदिराचा विकास, पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करणे, महापूर नियंत्रण, उड्डाण पूल, बास्केट ब्रिज, आयटी पार्क यासारखी महत्त्वाची कामे आधीच मंजूर असून त्यावर काम सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला असून हे रस्ते पुढील २५ वर्षे टिकतील, असेही महाडिक म्हणाले. सतेज पाटील यांच्या कार्यक्रमबाजीवर बोट ठेवले. “इव्हेंट करून जनतेची दिशाभूल केली जाते, पण आता कोल्हापूरकर फसणार नाहीत,” असा टोला त्यांनी लगावला. महाडिक म्हणाले की, राहुल गांधी यांच्या स्टाईलने प्रेझेन्टेशन दिले, पण गंगा म्हणून नाल्यात पडलेल्या राहुल गांधी यांच्यासारखी अवस्था झाली आहे. 15 वर्षे यांच्याकडे सत्ता होती त्यावेळी या गोष्टी का केल्या नाहीत? सतेज पाटील यांनी केएमटीमधून प्रवास करून दाखवला, पण याआधी कधी त्यांनी बसमधून प्रवास केला आहे का? अशी विचारणा त्यांनी केली.




