नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत असताना, या प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढला आहे. काही व्हिडीओ समोर आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.
याच पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेत चाकणकर यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे. त्यांनी गंभीर आरोप करत विचारलं की, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असलेल्या व्यक्तीने अशा वादग्रस्त व्यक्तींशी संबंध ठेवणे योग्य आहे का?
करुणा मुंडे म्हणाल्या की, जर रुपाली चाकणकर यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना पदावरून हटवावं. त्यांनी महिला आयोगाच्या पदाची जबाबदारी आणि त्याची संवेदनशीलता लक्षात घेता अशा घटनांवर कठोर भूमिका घेणं गरजेचं असल्याचंही नमूद केलं.
याशिवाय, त्यांनी इशारा देत सांगितलं की, चाकणकर राजीनामा देईपर्यंत त्या मंत्रालयासमोर आंदोलन करणार आहेत. हा विषय केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून महिलांच्या सुरक्षेशी संबंधित असल्यामुळे समाजानेही आवाज उठवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. एकूणच, अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून, पुढील काळात या प्रकरणावरून आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.




