राज्यातील १२ जिल्हा परिषदांसाठी आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी यंदा निवडणूक प्रक्रिया राबवली गेली. शनिवारी मतदान संपन्न झाले तर आज सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. साताऱ्यातल्या जिल्हा परिषद निवडणूक निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय निकवर्तीय नेते, राज्य सरकारमधील सहकारी मंत्री जयकुमार गोरे यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला.
जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांचे बंधू अरुण गोरे यांचा माण तालुक्यातील कुकडवाड गटात धक्कादायकरित्या पराभव झाला. त्यांच्या पराभवाने जयकुमार गोरे यांना मोठा धक्का बसला आहे. अरुण गोरे यांना निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी मोठी ताकद लावली होती. पण मतदारांनी अरुण गोरे यांना नाकारले.
तर दुसरीकडे औंध जिल्हा परिषद गटातून जयकुमार गोरे यांच्या वहिनी भारती गोरे यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे यांचा भारती गोरे यांनी पराभव केला. राष्ट्रवादीच्या मनिषा फडतरे या 40 मतांनी जिंकल्या अशी घोषणा करण्यात आली. परंतु फेरमतमोजणीत भारती गोरे यांनी विजय मिळवला. जयकुमार गोरे यांनी बंधू आणि वहिनींसाठी मोठी ताकद पणाला लावली, कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना कामाला लावले. मात्र मतदारांनी अरुण गोरे यांना नाकारून भारती गोरे यांना साथ दिली. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी ‘कहीं खुशी कही गम’ अशी जयकुमार गोरे यांची अवस्था होती.




