युद्धजन्य परिस्थितीमुळे १ लाख महाराष्ट्रीय बांधव अडचणीत; मदतीसाठी सरकारकडून युद्धपातळीवर हालचाली सुरू
रमजानच्या पवित्र महिन्यात उमरा या धार्मिक विधीसाठी सौदी अरेबियाला गेलेले महाराष्ट्रातील सुमारे ५० हजार ते १ लाख मुस्लिम बांधव सध्या तिथेच अडकून पडल्याची चिंताजनक माहिती समोर येत आहे. मध्यपूर्व आशियात इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या भीषण युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा थेट फटका या यात्रेकरूंना बसला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या भाविकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी हज यात्रेसाठी जाणाऱ्या नागरिकांची सरकारकडे अधिकृत नोंद असते, मात्र उमरा विधीसाठी जाणारे भाविक प्रामुख्याने खाजगी टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवास करतात. यंदा ५०० हून अधिक टूर ऑपरेटर्सनी मोठ्या संख्येने यात्रेकरूंना सौदीत नेले होते. युद्धामुळे विमान उड्डाणांवर निर्बंध आल्याने हे सर्व बांधव तिथेच अडकले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांचा समावेश असल्याने, तिथे मुक्काम वाढल्यास त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
राज्य अल्पसंख्यांक आयोगाने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून केंद्र सरकार आणि संबंधित दूतावासांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. खाजगी टूर ऑपरेटर्सकडून प्रवाशांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी विशेष विमानांची किंवा सुरक्षित मार्गांची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे. युद्धसदृश वातावरणामुळे अडकलेल्या या कुटुंबियांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण असून, सरकारकडून मिळणाऱ्या मदतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




