होर्मुज सामुद्रधुनीनंतर आता भारताच्या जलमार्गाला धोका; इंधन तुटवड्याने जगाचे धाबे दणाणले
इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्षाने आता रौद्र रूप धारण केले असून त्याचे पडसाद संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर उमटत आहेत. इस्त्रायलने इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केल्यानंतर इराणने चोख प्रत्युत्तर देत सौदी अरेबिया आणि कतारमधील गॅस प्रकल्पांवर हल्ले चढवले आहेत. या धुमश्चक्रीमुळे कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा धोक्यात आला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे इराणने ‘होर्मुज सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) मधून जाणारी व्यापारी जहाजे रोखल्यामुळे जागतिक ऊर्जा संकट अधिक गडद झाले आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गगनाला भिडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या युद्धाचा सर्वात मोठा फटका भारताला बसण्याची भीती आहे, कारण इराणने आता भारतापासून अवघ्या १८०० किमी अंतरावर असलेल्या ‘डिएगो गार्सिया’ या अमेरिकन लष्करी तळावर क्षेपणास्त्रे डागली आहेत. हिंद महासागर हा भारतासाठी व्यापाराचा मुख्य मार्ग असून या भागात अशांतता पसरणे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘धोक्याची घंटा’ आहे. होर्मुज खाडीतील तणावामुळे आधीच भारताची डोकेदुखी वाढली असताना, आता युद्धाची ही आग भारताच्या जलद्वारापर्यंत पोहोचली आहे. जर हा संघर्ष असाच चिघळला, तर केवळ इंधनच नव्हे, तर इतर जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीवरही गंभीर परिणाम होऊन भारतासमोर मोठे धोरणात्मक आणि आर्थिक आव्हान उभे ठाकणार आहे.




