भारतीय महिला क्रिकेट टीम आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मार्च महिन्यात होणाऱ्या एकमेव कसोटी क्रिकेट मॅचसाठी बीसीसीआयने (BCCI) भारतीय टीमची घोषणा केली आहे. भारतीय महिला टीम खूप कमी कालावधीत कसोटी क्रिकेट खेळताना दिसते, त्यामुळे ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य टीमविरुद्धची ही मॅच अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या टीममध्ये अनेक युवा आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, महिला क्रिकेटमधील आगामी पिढीला तयार करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
या सिरीजचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे टीममध्ये करण्यात आलेले पाच नवीन बदल. वनडे वर्ल्ड कपमध्ये जखमी झालेली प्रतिका रावल आता कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून पुनरागमन करत असून, तिला पहिल्यांदाच या फॉरमॅटमध्ये संधी मिळाली आहे. तिच्यासोबतच फास्ट बॉलर क्रांती गौड, स्पिनर वैष्णवी शर्मा, अमनजोत कौर आणि सायली सातघरे या खेळाडूंची पहिल्यांदाच भारतीय कसोटी टीममध्ये निवड करण्यात आली आहे. अनुभवी खेळाडूंच्या फळीत शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल आणि दीप्ती शर्मा यांसारख्या मॅचविनर खेळाडूंचा समावेश आहे. विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळण्यासाठी रिचा घोष आणि उमा छेत्री या दोन पर्यायांना टीममध्ये स्थान मिळाले आहे. रेणुका ठाकूर आणि स्नेह राणा यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय टीमला ऑस्ट्रेलियाच्या तगड्या बॅटिंग लाईनअपला रोखण्यासाठी नक्कीच होईल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मॅचसाठी भारतीय टीम -: हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना (व्हाईस कॅप्टन), रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), रेणुका ठाकूर, स्नेह राणा, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, क्रांती गौड, जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, वैष्णवी शर्मा, अमनजोत कौर, दीप्ती शर्मा आणि सायली सातघरे.




