एकदिवसीय मालिकेसाठी नवख्या खेळाडूंना संधी, ऑस्ट्रेलियात पहिल्या मालिकाविजयाचे आव्हान
वूमन्स प्रीमियर लीग (WPL) 2026 संपल्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 15 फेब्रुवारी ते 6 मार्चदरम्यान टी-20 आंतरराष्ट्रीय, एकदिवसीय मालिका आणि एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. यातील टी-20 आणि एकदिवसीय मालिकांसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने शनिवारी, 17 जानेवारी रोजी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. कसोटी सामन्यासाठीचा संघ लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दिली आहे.
या दौऱ्यात टी-20 आणि एकदिवसीय अशा दोन्ही मालिकांमध्ये प्रत्येकी तीन सामने खेळवले जाणार आहेत. टी-20 मालिकेचे सामने 15 ते 21 फेब्रुवारीदरम्यान होणार असून, त्यानंतर 24 फेब्रुवारी ते 1 मार्चदरम्यान एकदिवसीय मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे.
या दोन्ही मालिकांमध्ये हरमनप्रीत कौरकडेच संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर अनुभवी फलंदाज स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून संघाला साथ देणार आहे.
निवड समितीने एकदिवसीय संघात वैष्णवी शर्मा आणि जी कमलिनी या दोन नवख्या खेळाडूंना पहिल्यांदाच संधी दिली आहे. दोघींनीही याआधी श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळताना आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. याशिवाय काश्वी गौतम हिचं संघात पुनरागमन झालं आहे.
भारतीय महिला संघाला आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली यंदा भारत ही दीर्घ प्रतीक्षा संपवणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
एकदिवसीय मालिकेचे सामने:
- पहिला सामना – 24 फेब्रुवारी, गाबा
- दुसरा सामना – 27 फेब्रुवारी, होबार्ट
- तिसरा सामना – 1 मार्च, होबार्ट
ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्रीचरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), काश्वी गौतम, अमनजोत कौर, जेमिमा रॉड्रिग्स आणि हरलीन देओल.




