भारतीय क्रिकेट संघाची न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 11 जानेवारीपासून सुरू होत असून, बीसीसीआयने शनिवारी या मालिकेसाठी संघ जाहीर केला. या संघात शुभमन गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर श्रेयस अय्यरची उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाली आहे. मात्र, या निवडीसोबतच ऋतुराज गायकवाडला संघाबाहेर ठेवण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रायपूर येथे झालेल्या वनडे सामन्यात ऋतुराजने शानदार शतक झळकावले होते. याशिवाय विजय हजारे ट्रॉफीमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती. असे असतानाही न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड न झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर टीका केली आहे.
दरम्यान, माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांनीही या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर ऋतुराज गायकवाडचा फोटो शेअर करत, कठीण परिस्थितीतही हार न मानण्याचा संदेश दिला. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठीची स्पर्धा खूप कठीण असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
निवडीनंतर अनेक चाहत्यांनी बीसीसीआयच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सातत्यपूर्ण कामगिरी आणि देशांतर्गत स्पर्धांतील फॉर्मला पुरेसं महत्त्व दिलं जात नसल्याचा आरोप केला जात आहे. तसेच नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या निवडीवरही चर्चा होत असून, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना संघात स्थान न दिल्याबाबतही सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
एकूणच, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच भारतीय संघाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला असून, आता संघ मैदानावर कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.




