कच्च्या तेलाच्या टंचाईमुळे पाईप आणि मोटार महागली; गॅस साठेबाजीविरुद्ध धाराशिव आणि भंडाऱ्यात प्रशासनाचा ‘ॲक्शन मोड’
आखाती देशांतील युद्धाचा वणवा आता थेट भारतीय शेती क्षेत्राला पोळू लागला आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने आणि पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने शेतीसाठी लागणाऱ्या सिंचन साहित्याच्या दरात ३५ ते ४० टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे. पीव्हीसी पाईप, ठिबक आणि तुषार सिंचन संच निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल महागल्याने उन्हाळी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. ९० एमएमच्या पीव्हीसी पाईपमध्ये थेट ४० टक्के वाढ झाली असून, मोटार पंप केबलचे दर तर ८५ टक्क्यांनी वाढून १६५ रुपये प्रति मीटरवर पोहोचले आहेत. यामुळे नवीन सिंचन व्यवस्था उभी करताना शेतकऱ्यांना एकरी १५ ते २० हजार रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.
एकीकडे शेती साहित्याची महागाई वाढलेली असताना, दुसरीकडे गॅसच्या तुटवड्याचा फायदा घेत सुरू असलेल्या काळाबाजारावर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी साठेबाजीविरुद्ध कडक इशारा दिला असून, तुळजापूर आणि येरमाळा यात्रेच्या पार्श्वभूमीवर गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दररोज आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर थेट धाड टाकून जप्तीची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भंडाऱ्यातही पुरवठा विभागाने पोलिसांच्या मदतीने हॉटेल आणि खानावळींवर मोठी छापेमारी केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३८ सिलिंडर जप्त करण्यात आले असून चार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. “जिल्ह्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,” असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी केले आहे. युद्धाच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट करणाऱ्यांविरुद्ध आता राज्यभर प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.




